कोरोनाचा साईड इफेक्ट : राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द

मुंबई- करोनाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहाता आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
राज्यातील इतर बोर्डांकडून देखील अशा प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेण्यात आले आहेत. याआधी ICSE आणि CBSE या दोन बोर्डांनी देखील त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता. त्यानंतर अखेर राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करावं, यावर तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल, असं देखील राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.