कॉपीराईट कायदा कलाकारांचे हित सांभाळेल:प्रकाश जावडेकर

पुणे : 'पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ही अभिवादन करण्याची संधी आहे.दोन पिढ्यांवर त्यांनी सुरांची जादू केली.आपल्या सर्वाना त्यांनी कानसेन केले. दैनंदिन कामात आपल्याला हे सूर सोबत करतात.केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉपीराईट कायद्यातून आम्ही कलाकारांना न्याय दिला आहे. गीतकारांना,वादकांना.संगीतकारांनाही न्याय दिला जाईल.काही बैठकीनंतर या शिफारशी येत्या महिन्या दोन महिन्यात अंतिम रूप देऊ. गीत,शब्द जिवंत असतील तोपर्यंत कॉपीराईट कायद्याचा फायदा मिळत राहील.आगामी काळात मैफलीचा आनंद नव्या जोमाने मिळत राहील',अशा शुभेच्छा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सायंकाळी व्हिडीओ संदेशा द्वारे दिल्या .
‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘खयाल यज्ञ’ या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ,रविवारी सायंकाळी त्यांनी व्हिडीओ संदेशा द्वारे महोत्सवाला शुभेच्छा दिल्या .
'संगीत ,साहित्य ,कलेतून सांस्कृतिक पाया आणि राष्ट्रीयत्व समृद्ध होते ,त्यामुळे असे संगीत महोत्सव राज्यभर ,देशभर आयोजित करण्याची काणेबुवा प्रतिष्ठानची जी योजना आहे ,त्यासंदर्भात राज्य सरकार आपले कर्तव्य पार पाडेल ', असे प्रतिपादन राज्य विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यासपीठावरून बोलताना केले. डॉ गोऱ्हे यांनी रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे या महोत्सवाला भेट दिली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या ,'पंडित भीमसेन जोशी यांची संगीताशी बांधिलकी होती . हे संगीत आपल्याला पुढे जायची उमेद देते. आपण खचत असताना उभारी देण्याचे काम करते ,त्यामुळे हा संगीत महोत्सव ऐतिहासिक स्वरूपाचा ठरला आहे .'यावेळी गोविंद बेडेकर ,मंजुषा पाटील ,श्रीकांत बडवे,सौ बडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . डॉ विनिता आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थिती मध्ये "खयाल यज्ञाचा" समारोप व वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती 'संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान' चे अध्यक्ष गोविंद बेडेकर आणि सचिव सौ. मंजुषा पाटील यांनी दिली.मिलिंद कुलकर्णी,राहुल सोलापूरकर , आनंद देशमुख,डॉ विनिता आपटे हे दिग्गज निवेदक या महोत्सवाचे निवेदन करीत आहेत .